‘प्र’च्या कविता

Tuesday 25 January 2011

शाळेत शिकलो होतो


शाळेत शिकलो होतो
अ – अननसाचा , आ – आईचा
आता भोगतोय
अ – अपयशाचा, आ – आसवांचा
शाळेत शिकलो होतो
२+२ = ४, १०/२= ५, ३x३= ९, ७-६= १
आता कळतंय
आयुष्यात नेहमीच बेरजा घडत नसतात
माणसं एकत्र येऊनही, एकत्र राहूनही
एक होत नाहीत
समांतर धावत असलेल्या रेषांसारखी
आयुष्यभर अंतर राखूनंच वागतात
आता कळतंय
भागाकार नसतो नेहमीच तोट्याचा,
जेवढं दुःख भागून द्यावं, ते कमी होत जातं
जेवढं सुख भागून द्यावं, ते वाढत जातं
असलं अद्भूतही घडतं
आता कळतंय
शाळेत शिकलो होतो
हायड्रोजन आणि आक्सिजन हे ज्वालाग्राही पदार्थ
मिळून पाणी तयार होतं.
आता उमजतंय पाणीही ज्वालाग्राहीच असतं.
शाळेत शिकलो होतो
राजे आग्र्याहून पेटा-यात बसून पळाले होते
औरंगजेबाच्या तावडीतून
आजही अभिमान वाटतो त्याचा
अन् आमचीही सुरू असते रोजचीच पळापळ
कधी कर्तव्यातून
कधी जबाबदारीतून
ज्याची लाज न वाटण्याइतपत कोडगेपणाही
आता मुरलाय आमच्यात सवयीनं.
शाळेत म्हणायचो प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे,
सारे भारतिय माझे बांधव आहेत,
आताही म्हणतोच पण जरा वेगळ्या सुरात.
भारत माझा देश आहे?
सारे भारतिय माझे बांधव आहेत?
शाळेत शिकलेलं सारंच खरं नव्हतं
पण निदान ते असह्य नव्हतं.
आता दररोज नव्यानं शिकताना
जुन्या गृहीतिकांची, सिद्धांतांची, तत्वांची
चिरफाड होताना
दररोज परिस्थितीपुढे
आपला कोंबडा होताना
आपलेच गुरूजन
आपल्यावरच चढताना
आपलेच देशबंधू
आपल्यालाच नाकारताना
आपल्याच देशात
शरणार्थ्यासारखं जगताना
आयुष्यात कधीकाळी शाळेत काही शिकलो होतो
असं म्हणायची हिम्मत होत नाही
आम्ही अजूनही आहोत निरक्षरंच
आणि दररोज आयुष्याच्या शाळेत
नव्या गोष्टी शिकताना जाणवतं की
यापुढेही राहू असेच
निरक्षर निरंतर.

No comments:

Post a Comment